आता माझ्या साऱ्या गोष्टी

Saturday, October 10, 2009

1 comments  

आता माझ्या साऱ्या गोष्टी
तुझ्यापाशी येऊन थांबतात
वाहणारे वारेही हल्ली
तुझीच कहाणी सांगतात

तुझ्या डोळ्यात खोलवर
झोप माझी विरलेली
तुझी माझी स्वप्नभेट
रोज रात्री ठरलेली
स्वप्नातल्या त्या गप्पांसोबत
रात्रीही हल्ली लांबतात

खिडकीतून झिरपणारी किरणे
अंगावर येताना वाटते असावा तुझाच हात
डोळे उघडल्यावर पण कळते सारे खरे
मिठीतल्या उशीनेही केलेला असतो घात
किरणे काय, उशी काय
सारे तुझेच अस्तित्व सांगतात

तु सांडलेल्या मोगऱ्याच्या गंधाचा
मी करत राहतो पाठलाग
कळ्याही वाटेवरच्या अवचित येतात खुलून
तुझा श्वास दरवळतो बनून पराग
चालता चालता शेवटी तुझ्या मिठीत येऊन पोहोचतो
आणि पुढचे सारे रस्ते संपलेले असतात

हसण्याचेही आताशा मी

Wednesday, October 7, 2009

2 comments  

हसण्याचेही आताशा मी कर्ज काढलेले
जगण्यासाठी श्वास थोडे उसने घेतलेले

शत्रूंच्या शोधात काल निघालो मी जेव्हा
मित्र माझे नेमके वाटेत भेटलेले

मनात धुंडाळता अलगद आठवणींचे कप्पे
तिच्या नावाखाली काही अश्रू सांडलेले

आयुष्यभर शोधिली मी माझ्या जगण्याची कारणे
उत्तर शेवटी मिळाले मरणाशी सांधलेले

नकोच होते एवढे तरी मागून घेतले मी
हवे होते मात्र जे न घेताच राहीले

कविता का? कुणावर? कशासाठी?

Tuesday, September 8, 2009

1 comments  

कविता का? कुणावर? कशासाठी?
असले क्षुल्लक प्रश्न विचारु नये कधी
मनातल्या भावना मोकळेपणाने मांडत्या आल्या असत्या
तर कुणी कविता केली असती का कधी?

काही लोकांना कविता वाचल्यावर "हि कविता कोणावर केली?", "असल्याच कविता का करतोस?" असले प्रश्न विचारण्याची सवय असते पण प्रत्येक वेळी उत्तर देण्यासारखं असतंच असं नाही. एखाद्या कवितेवरुन तुमच्या आयुष्यावर तर्क-वितर्क केले जातात. हे कधी कधी नकोसं वाटतं...असले प्रश्न विचारणाऱ्यांना माझ्यापरिने दिलेलं उत्तर....आता "हि कविता कुणावर केली आहेस?" असं विचारलं नाही म्हणजे मिळवली!

आधीच कळलं होतं.....

Monday, August 31, 2009

6 comments  

भावनाशुन्य जगावं लागेल हे आधीच कळलं होतं
पुढची संकटं ओळखून आधीच पाऊल वळलं होतं

तुझ्या जाण्याने फ़ारसं दु:ख झालं नाही कदाचित
तुझं जाणं तुझ्याआधीच मला कळलं होतं

मनातल्या आठवणींचा वृक्ष हलला होता जरासा
पिवळं होण्याआधीच तुझं पान गळलं होतं

यार कसले जपले तेही उलटलेच शेवटी
मरण्याआधीच त्यांनी माझं सरण जाळलं होतं

कुठल्याही कंपूत मला सामील केले नाही कोणी
मी येण्याआधीच माझं त्यांनी नाव गाळलं होतं

त्यांच्या प्रासादात बोलावणं नव्हतं तरी गेलो होतो एकदा
पण जा म्हणण्याआधीच माझं पाऊल वळलं होतं

हल्ली मला गजल हा प्रकार बराच खुणावतोय पण ते लिहिणं भरपूर कठीण आहे हे लिहिताना लक्षात येते. याआधी पण मी दोन-तीन वेळा प्रयत्न केला होता पण आधीपेक्षा ह्यावेळी जरा जमून आल्यासारखे वाटते. माझी एक आधीचीच आठ ओळींची कविता आहे तिला आणि पाच शेर जोडून हे गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अभिप्राय जरुर कळवा.

हल्ली माझ्या नकळत

Saturday, August 29, 2009

0 comments  

पेनातून हल्ली
माझ्या नकळत
मनात दडवलेल्या गोष्टी
अलगद कागदावर उतरतात
मी तिऱ्हाईताप्रमाणे बघत राहतो
माझ्याच मन, पेन व हातानी
माझ्याविरुध्द चालविलेले हे डाव
आणि टेबलावर वाढत जाणारे
कवितांचे बाड!

काल भर चौकात

Tuesday, August 11, 2009

8 comments  

काल भर चौकात एका म्हाताऱ्यामागे
एक पिसाळलेला कुत्रा लागला
म्हातारा पळू लागला जिवाच्या आकांताने
पाहत होता बाजार सगळा
एवढ्यात कुठून कोण जाणे
एक काळं टि-शर्ट घातलेल्या माणसाने
झाडली कुत्र्यावर एक गोळी
कुत्रा तिथेच गतप्राण झाला
फ़ोडून एक किंकाळी
भेदरलेल्या म्हाताऱ्याभोवती
एव्हाना घोळका सारा जमला
त्या इसमाच्या नावानेही
जयघोष सुरु झाला
कोणी म्हणालं
त्या हिंदू माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी हिंदू नाही!"
आणखी कोणी म्हणालं
त्या मुस्लिम माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी मुस्लिम नाही!"
आणखी कोणीतरी बोलला की
त्या ख्रिस्ती माणासनं म्हाताऱ्याचा जीव वाचवला
तो म्हणाला "मी ख्रिस्ती नाही!"
ह्यावर त्याला लोकांनी विचारलं
’तु कोण आहेस?’
तो म्हणाला मी काही देव-धर्म मानत नाही
मी एक नास्तिक आहे
हे ऐकताच कोणीतरी ओरडलं
त्या हिंसक नास्तिकाने
एका कुत्र्याचा बळी घेतला
ठेचा त्याला!"

काल भर चौकत एका नास्तिकामागे
एक पिसाळलेला समाज लागला!

झाली सांज एकाकी

3 comments  

झाली सांज एकाकी
कोणी वाजवेना पावा
सूर हरपल्या मनी
कृष्ण दाटून का यावा?

का रंग मावळतीचे
आज काळॊखी बुडाले
का पंख परतीचे
आज नाही ऊडाले
काजळता संध्याकाळ
वाहे उदासीन हवा

अवघडलेला चंद्र
चांदणीही बुजलेली
अवेळीच्या काळोखाने
रातराणी कोमेजलेली
झुळूक हळवी येताच
उर का भरावा?

पिसे होई मन
धावे दिशाहीन
वाट चाले आंधळी
क्षितिजात होता लीन
सैरभैर धरणीला
कंप का फ़ुटावा?